तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व : देशमुख

Ahmednagar Breaking News
0

तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व : देशमुख.

 नगर प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रिंट आणि डिजिटल मीडियातून बातम्या, चालू घडामोडी समाजासमोर मांडल्या जातात. आजही प्रिंट मीडियावर समाजाचा मोठा विश्वास आहे. तोच विश्वास डिजिटल मीडियाने प्राप्त करावा,असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले.

           मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडियाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी देशमुख बोलत होते.याप्रसंगी राज्य अध्यक्ष शरद पाबळे, वरिष्ठ पदाधिकारी मन्सूर शेख, प्रदीप पेंढारे, नीलेश आगरकर, विक्रम बनकर, महेश भोसले, आबिद खान, बाबा ढाकणे, यतीन कांबळे, शब्बीर सय्यद, मुकुंद भट, शुभम पाचरणे,सौरभ गायकवाड, सागर तनपुरे,अमीर सय्यद, अन्सार सय्यद,वैभव घोडके, तुषार चित्तम, दीपक कासवा, सबिल सय्यद, अनिकेत यादव, प्रियांका धारवाले,मंजू भागानगरे आदी उपस्थित होते.

            देशमुख म्हणाले, की डिजिटल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. हा दृष्टिकोन आपल्या कामातून बदलण्याची गरज आहे.राज्यभर डिजिटल मीडियाचे सुमारे पंधरा ते वीस हजार पत्रकार काम करतात. त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या छताखाली आणून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी मराठी पत्रकार परिषद प्रयत्नशील आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषद संलग्न  महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना केलेली आहे. आफताब शेख हे जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील पत्रकारांना संघटित करून चांगले काम उभा करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्याचा पत्रकारितेमध्ये राज्यात एक वेगळा ठसा व दबदबा असल्याचेही ते म्हणाले.

             शरद पाबळे म्हणाले, की मराठी परिषदेचे काम  राज्यभर उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे. पत्रकारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख काम करत आहेत. पत्रकारांच्या संरक्षणापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंतचे प्रश्न सोडविले गेले आहेत. पत्रकारितेचे जुने स्वरूप आता बदलत चाललेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व प्राप्त झालं आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषद आपल्या संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना केली आहे.

                सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष आफताब शेख म्हणाले, की जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, या क्षेत्रात कार्यरत युवापत्रकारांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. पदाच्या माध्यमातून डिजिटल मीडियातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले. लवकरच डिजिटल मीडियाची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद अहमदनगर शाखेचे उद्घाटन देखील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top